Wikipedia

Search results

Monday 8 April 2013

संदीप खरे यांच्या कविता

बुंबुंबा

आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून
पडका वाडा बसला आहे दबा धरून
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर
दिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर
परंतु तेथे जावयास ना कोणा धीर
कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला
त्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा

ह्रीं ह्रां ह्रीं फट् ॐ फट् स्वाहा
कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी
उच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी
दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ
काठावरती येऊन बसते संध्याकाळ
पाण्यावरती पडता छाया सांजेची
दिवसावर हो काळी जादू रात्रीची
घुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे
विरून जाती रूप धारती घुबडांचे
घुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या
तरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या
भीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला
आळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा

हिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस
नाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस
उडता येते परी आवडे सरपटणे
गाळ चोपडे अंगाला जैसे उटणे
उठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक
पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
अन्य न काही चाले या बुंबुंबाला
भूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला
जे जे दिसते त्याची चटणी जोडीला
खा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा

खोडी काढी खोटे जर बोले कोणी
आणेल कोणी आईच्या डोळा पाणी
चोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी
बुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी
जवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे
त्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे
बुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा
खापरखापरपणजोबांहून पूर्वीचा
त्यास न भितो असा जगातून कोण भला
बुंबुंबाही घाबरतो बुंबुंबाला
करण्याआधी वाईट काही रे थांबा
दिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा
                   

डोंगळ्याचं जीणं

"तुझ्याकडे तर दिसत नाही एखादीही डिग्री..."
पारावरच्या डोंगळ्याला मी विचारले -
"...आणि तरीही चांगला गलेलठ्ठ जगतो आहेस..."

तो थबकला
कसनुसं म्हणाला -
"छे ! आमचं कसलं आलंय...डोंगळ्याचं जीणं !"

"नाहीतरी काय एवढा फरक आहे ?"
मी म्हणालो...
आणि डोंगळ्यासारखा तुरूतुरू पुढे निघालो......

------------------------------------संदीप
   

दोघे...नकळते...

...ती म्हटली - ’ते आलेच ओघाओघाने...’
मी म्हटले - "तू कधी येणार ?-
- ओघाओघाने जाऊ दे
निदान एखादी बारीकशी धार ?"

...ती म्हटली - ’तुला काय ? आता खुश्शाल
झोपशील...’
मी म्हटले - " आमेन ! -
- अजून बरीच रात्र आहे शिलकीत...
मेणासारखा चटके खात
मेणबत्तीभोवतीच जमेन !!"

...ती म्हटली - ’कळतच नाही काय बोलतोस...
मी जातेच कशी !’
मी म्हटले - "ते आलेच ओघाओघाने...
आता रात्रीच्या मिठीत मी
आणि माझ्या मिठीत उशी !!".......

-----------------------------------------------संदीप


धैर्य

जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत आsत...
अगदी आssत?...
माहित नाही......


जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......

...ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनी ’चाचपत’ राहते,
सद्ध्या तिच्या असलेल्या हातांनी’
सद्ध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापर्या कापर्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !

------------------------------------- संदीप .
  

सफरचंद

सफरचंदाने ना फक्त पडायचे असते
करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची-‍‍ना पिकल्याची
करायची नसते काळजी फांदीखालील बेसावध डोक्यांची
वेळ झाली कळताक्षणी सारा गर गोळा करून
फांदीवरच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

मग ते पाहून कुणाला गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सुचू देत-ना सुचू दे
सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ देत-न खाऊ दे
पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे
सुचणाऱ्यागत पडणाऱ्याने नोबेल‍‍-बिबेल मागायचे नसते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

विचार नसतो करायचा की स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जा कशी होते
नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते
नियम माहित असोत-नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते
जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते
जर पृथ्वी असेत ते तिने ओढायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने, की कुणीतरी हळूवार झेलावे
किंवा उगवावे थेट चंद्रावर, आणि मग पिसासारखे अलगद पडावे
पण एकेक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुरडायचे असते
अन् चिख्खल असो वा माती असो, दिवस असो वा रात्र असो, फळ असो वा दगड असो
एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते           

मैत्रिण

मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ
     

तू

गौरगुलाबी चर्येवर

लालकेसरी टिकली टेकलेली...



लालचुटुक ओठांत

गडद गुलाबी गुपिते मिटलेली....



लालगुलाबी वस्त्रांत

सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...



मंद गुलाबी गंधाची

एक देहकुपी लवंडलेली...



सभोवताल्यांशी राखलेलं

एक फिकटं गुलाबी अंतर...



तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;

तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

मी फसलो म्हणूनी...

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

तुटले

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

करार

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !

सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !

संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !

विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !

मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!

मोरपंखी पिसर्‍यांनी ही मिटण्याची वेळ !

सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !

खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !



चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !

लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !

मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !

लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !

नजरा, आठवण, शपथा . . . सार्‍यांस उन्ह द्यायला हवे !

जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !

हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे

माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !

समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !

एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !

भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !

मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !

तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !

खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !

' करार पूर्ण झाला ' अशी तेवढी दे !

दूरदेशी गेला बाबा...

दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !!

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......
लागते अनाम ओढ श्वासाना
येत असे उगाच ओठाना
होई का असे तुलाच स्मरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

एकांती वाजतात पैजणे
भासांची हालतात कंकणे
कासावीस आसपास बघताना.....
तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

मी असा जरी निजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

आज काल माझाही नसतो मी
सर्वातुन एकटाच असतो मी
एकटेच दूर दूर फ़िरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

सरीवर सर…

दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे मझे तुझ्या मनभर

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

कसे सरतील सये...

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन...

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

नामंजूर

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे - फ़ुगवे... भांडणतंटे... लाख कळा
आपला - तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

नीती, तत्वे... फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे - नामंजूर!

हे भलते अवघड असते

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते….
     
 
     

No comments:

Post a Comment