Wikipedia

Search results

Wednesday 26 February 2014

अनुराधा पाटील

अनुराधा पाटील


1981 ते 2005 या 24 वर्षात अनुराधा पाटील यांच्या चार कविता संग्रहात एकूण 224 कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या कवितांचा वेगळा `पिंड’ असून त्या कवितांवर त्यांचीच छाप दिसून येते.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुराधा पाटील यांचे शिक्षण पहूर (ता. जमनेर) येथे दहावीपर्यंत झाले. त्यांच्या कवितेने स्वतःची स्वतंत्र वाट शोधलीच पण त्याचबरोबर समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करणार्या प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून स्थान निर्माण केले आहे. अनुराधाताईंच्या एकूण लेखनाविषयी, नवीन लिहित असलेल्या कवितांविषयी आणि बालपणीच्या आठवणींविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणतात की, माझ्या लेखनाची, कविता लिहिण्याची सुरुवात शाळेत असल्यापासूनच झाली. साधारणपणे मला आठवतं की, तिसरी ते चौथीत असेन त्यावेळी भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले असल्याने स्वातंत्र्यानंतरच बदलाचे वातावरण होते. मात्र असे असले तरीही मुलींना खूप शिकू देतील असे वातावरण नव्हते. तरीही शाळेत असताना मी कविता, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचे. पुढे मात्र दहावी झाले आणि काही दिवसातच माझे लग्न कौतुकराव ढाले पाटील यांच्याशी झाले. माझे पती हे मराठीचे प्राध्यापक होते त्यामुळे त्यांच्यामुळे माझ्या कविता करण्याला त्यांच्याकडूनच प्रोत्साहन मिळाले असे मी म्हणेन आणि मग त्यांच्यामुळेच मी लग्नानंतरही कविता लेखन सुरू ठेवले.

तुमची पहिली कविता कोठे छापून आली होती का, यावर अनुराधाताई म्हणतात की, लग्नानंतर खर्या अर्थाने माझे जोमाने कवितालेखन सुरू झाले. या काळात मला सुचतील त्या कविता मी एका वहीत लिहून ठेवत होते. मग त्यातलीच एक कविता औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणार्या `प्रतिष्ठान’ या मासिकात छापून आली. डॉ. सुधीर रसाळ हे त्यावेळी त्या मासिकाचे काम पाहत आणि ही कविता प्रसिद्ध झाल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मग मी अधिक जोमाने कविता लिहू लागले. त्यानंतर 1981 साली माझा दिगंत, 1985 साली `तरीही’ आणि 1992 मध्ये `दिवसेंदिवस’ असे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले तर साधारण 13 ते 14 वर्षांनी `वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हा कवितासंग्रह 2005 साली प्रकाशित झाला. 1992 नंतर खूप वर्षांनी तुमचा चौथा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मध्ये खूप वर्षे आपण लिहितच नव्हतात का, असे विचारताच खूपच भावनिक झालेल्या अनुराधा ताईंचा स्वर कापरा झाला. माझा मुलगा या दरम्यान आमच्यातून निघून गेल्याने कविता लेखन करण्यास मनच तयार होत नसे त्यामुळे मग खूप वर्षांनी कधीतरी या कवितांनी मोहात पाडले आणि मग `वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला.

आपल्या कविता या चिंतनात्मक असतात असे म्हटले जाते तर स्त्रियांच्या जाणीवा, भावना आपण खूप हळूवार पद्धतीने मांडता हे कसे काय याविषयी त्या म्हणतात की, माझ्या कविता या स्वतःची वाट शोधतात. मला माहीत आहे की, स्त्रियांच्या जीवनातील दुःखाला, एकाकीपणाला, सोशिकतेला पर्यायच असू शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मी माझ्या `दिवसेंदिवस’ या कविता संग्रहातले देईन. या संग्रहातील `काळ्या कातळाच्या छातीत’ ही त्यांची कविता प्रखर आत्मविश्वास जपताना दिसतात. ती कविता अशी आहे – काळ्या कातळाच्या छातीत घुसमटणार्या

मातीच्या कणांनाही ओढ लागते

मुळं रुजवत नव्या कोंबातून

प्रकाश पाहण्याची आणि मी देईन

तेवढाच अर्थ उरतो मग तुझ्या असण्याला

जगण्याच्या संदर्भात.

सध्या आपले नवीन लिखाण काय सुरू आहे आणि विविध ठिकाणी होणार्या प्रकाशन समारंभ, चर्चा, संमेलने यास आपण उपस्थित राहिला का? यावर त्या म्हणतात की, आता अगदी नवीन असे काही कविता लेखन सुरू नाही पण मध्येच असे काही सुचले आणि लिहावेसे वाटले की एका वहीत लिहून ठेवते. पण सध्यातरी लिहून ठेवलेल्या कवितांचा संग्रह करावा असे डोक्यात नाही आणि पुरस्कारांचे म्हणाल तर पुरस्कार खूप मिळाले आणि मी त्याबद्दल समाधानीही आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट भाष्य लेखनाचा, केशवसुत पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कविता लेखनाबरोबर मी काही कथाही लिहिल्या, त्याही विविध मासिकात छापून आल्या. विशेष म्हणजे मी लिहिलेल्या कवितांचा `अनुराधा पाटील की कविताएँ’ हा 75 कवितांचा हिंदी अनुवाद दिल्लीहून प्रकाशित झालाय, याचा मला आनंद आहे.

अनुराधा पाटील यांच्याविषयी असे म्हणता येईल की, त्यांच्या कविता आज मराठीत अग्रेसर आहेत आणि म्हणूनच की काय, मराठीतील प्रथम दर्जाच्या 20 समीक्षकांनी घडवलेलं अनुराधा पाटील यांच्या कवितेचे दर्शन `अनुराधा पाटील यांची कविता’ संपादक डॉ. दादा गोरे यांच्या पुस्तकातून घडले. मुंबईच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सभासद म्हणून दिल्लीच्या साहित्य अकादमीच्या सदस्य आणि कोलकाताच्या भारतीय भाषा परिषदेच्या मानद सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी मराठी भाषा जपण्यासाठी तसेच या भाषेतील शुद्धलेखन, कवितेचे प्रकार, विविध भाषा प्रकार यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला आहे.

एकंदरीतच अनुराधाताई यांच्या कविता आणि जीवनाकडे बघण्याची त्यांची जाणीव अधिकाधिक विकसित झालेली दिसते. त्यांच्या कवितांतून चिंतन तर होतेच एकूणच त्यांच्या कविता भीषण सत्य मांडतात आणि आपण फक्त अंतर्मुख होत जातो

            मी अनुराधा पाटील .
मनुष्याला जे हवे असते ते मिळतेच. तो ज्याचा नेहेमी विचार करतो ते समोर येतेच.

माझेही तसेच झाले . मी साधी गृहिणी होते.कोणालाही काही त्रास किंवा वेदना असल्या तर मला असे वाटे की कोणाच्याही वेदना मला सहजतेने, स्पर्शाने दूर करता याव्यात.

मुले लहान असताना त्यांचे छोटे मोठे आजार सहजतेने नैसर्गिक रीतीने व औषधाशिवाय बरे करता यावेत असे मला वाटे.  त्यासाठी नॅचरोपॅथी  , आयुर्वेद, आहारशास्त्र , बर्‍याच गोष्टीचे छोटे मोठे कोर्सेस  केलेत . मुलांसाठी चाइल्ड सायकॉलॉंजीच्या पुस्तकांचेही बरेच वाचन झाले. पण अजून हवे ते मिळाले नव्हते. फारसे पथ्य न करता, त्वरित रिझल्ट देणारे असे काही हवे होते. वेदना किवा व्याधी निवारणासाठी नियमीतपणे फारशी उठाठेवही करायची नव्हती. थोडक्यात आखूड शिंगी आणि बहु दुधी गाय हवी होती.

याच काळात माझे पती मोहन यांना मानेचे व पाठीचे दुखणे सुरू झाले. ते pain killers , traction, short wave diathermy अनेक उपचार व यासाठी अनेक डॉक्टर्स झालेत.

शेवटी अॅक्युप्रेशर केंद्रावर काही प्रमाणात रिलीफ मिळाला व माझे पती मोहन यांनी मला ही विद्या शिकण्यास प्रोत्साहन दिले. मला जुलै 1993मधे प्रा. पार्क यांचे सु जोक उपचारांचे कोर्स सुरू होणार असे कळले. त्यावेळी शिल्पा, माझी मुलगी 12 वी होऊन तिचे मेडिकल अॅडमिशन व्हायचे होते. आम्ही दोघींनी हा सुजोक अॅक्युपंक्चर कोर्स करायचे ठरवले.

अॅक्युप्रेशर केंद्रावर मला कळले की  प्रा .पार्क जे वू हे ह्या अॅक्युप्रेशर शास्त्राला हात आणि पाउलांवर खूप सोपे करून शिकवतात.आणि त्याचे रिझल्ट् ही लगेच दिसतात.

मला फार आनंद झाला.  त्यात मला हवे ते सारे दिसत होते . पण सर्वस्वी नवीन पद्धती असल्याने लक्ष देवून अभ्यास करावा लागणार होता. कारण याच्याही पुढे जाऊन हे उपचार वेदनेशिवाय कसे देता येईल हे शोधायचे होते.

दहा दिवसात त्यांनी बेसिक सुजोक , 12 ब्योल मेरीडियन , मसल डायग्नोसिस , 6की , टाइम अॅक्युपंचर, पल्स डायग्नोसिस सारे सारे  शिकवले. एवढे एकाच वेळी पचवणे मला कठीण  होते. पण शिल्पाच्या मदतीने सारे शक्य झाले. उपचारांना रिझल्ट्स ही चांगले मिळत होते.अर्थात सर्वात आधी प्रयोग झालेत ते माझे पती मोहन यांच्यावर . या उपचारांनी त्यांना संपूर्ण रिलीफ मिळाला व तद्नंतर कधीही मान व कंबर यासाठी बेल्ट वापरावा लागला नाही. त्यांचे  spondylosis चे दुखणे पूर्ण बरे  झाले.

माझ्या दोन्ही मुले आणि मोहन  हे उपचार शिकले. मी गेली 20 वर्ष वेदनारहित अॅक्युप्रेशर कसे द्यावे यावर संशोधन चालू  ठेवले. हजारो विद्यार्थी व रुग्ण ही पद्धत माझ्याकडून शिकून गेलेत.

वेदनारहित आरोग्य उपचार सर्वांपर्यंत पोहोचवावे यासाठीच हा लेखन प्रपंच .

आपणच आपल्याला - अनुराधा पाटील
आपणच आपल्याला लिहीलेली
पत्र वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वा-यावर पानं

थोडंसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधी तरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वराचं एखादं गाणं

आपणच जपावेत मनात
वा-यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी दूरात धावणारी पायवाट
जपावेत काही नसलेले भास

जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास

सुख बोलत नाही
सुख बोलत नाही;
ते कणाकणातून फक्त झिरपत राहतं
कडेकपारीतून ठिबकणा-या सहस्त्रधारेसारखं
फेसाळत्या दुधासारखं ते जिवणीच्या कडेकडेनं सांडत असतं.
तीराला बिलगणा-या फेसासारखं ते नाच-या डोळ्यांतून खेळत असतं.
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
आभाळाला ओढून घेणा-या सरोवरासारखं
ते जीवाला स्वत:त ओढून घेतं, लपेटून घेतं.
—- निरोपाच्या थरथरत्या क्षणी बोलू पाहतं ते सुखच असतं
तेव्हाही त्याची भाषा असते हुंकाराची, खुणेची,
डोळ्यांत साकळलेल्या आसवांची
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
ते असतं…. फक्त असतं.

अनुराधा पाटील यांना "दुःखी' राज्य काव्य पुरस्कार
जालना - शहरातील नंदकिशोर सहानी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा कै. राय हरिश्‍चंद्र साहनी दुःखी राज्य काव्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना त्यांच्या समग्र योगदानाबद्दल देण्यात येणार असल्याची माहिती विनीत साहनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील गीता भोज या ठिकाणी शुक्रवारी (ता. एक) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. साहनी यांनी ही माहिती दिली. या वेळी नवल साहनी, प्रा. जयराम खेडेकर यांची उपस्थिती होती. नंदकिशोर सहानी चॅरिटेबल टस्ट व "ऊर्मी'च्या वतीने दरवर्षी गुढी पाडव्यास "कवितेचा पाडवा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कै. राय हरिश्‍चंद्र साहनी दुःखी राज्य काव्य पुरस्कार यानिमित्ताने देण्यात येतो, अशी माहिती या वेळी श्री. साहनी यांनी दिली. यंदाचा चौदावा राज्य काव्य पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील यांना कवितेतील समग्र योगदानाबद्दल देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रोख 21 हजार रुपये,  सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कवितांवर दोन दिवस चर्चासत्र
सुप्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कवितांवर मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रात राज्यातील व महाराष्ट्राबाहेरील अभ्यासक आपले निबंध सादर करणार आहेत. २६ व २७ ऑक्टोबर रोजी मसापच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात हे चर्चासत्र होणार आहे.
मसापतर्फे फादर थॉमस स्टीफन्स, ना. धों. महानोर, रा. रं. बोराडे यांसह विविध लेखक-समीक्षकांच्या साहित्यामध्ये चर्चा घडवून आणलेली आहे. अशा प्रकारच्या या वर्षीच्या उपक्रमात कवयित्री अनुराधा पाटील यांच्या काव्यलेखनावर चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्राचे उद्घाटक ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ असून पहिल्या सत्रात 'अनुराधा पाटील आणि समकालीन मराठी कविता' यावर डॉ. वसंत पाटणकर निबंध सादर करणार आहेत. 'अनुराधा पाटील यांच्या कवितेतील स्त्रीत्वाचा शोध' यावर प्रा. नितीन रिंढे, तर त्यांच्या कवितेतील स्त्रीवादी आकलन यावर डॉ. माया पंडित यांचे निबंध सादर होणार आहेत. 'कवितेची रचनातत्त्वे' यावर प्रवीण बांदेकर व 'काव्यशैली' यावर डॉ. हरिश्चंद्र थोरात यांचे निबंध असतील. चौथ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रकांत पाटील असणार आहेत. दुसऱ्या दिवशी डॉ. सुषमा करोगल (बडोदा), नांदेड येथील पी. विठ्ठल व उल्हासनगर येथील प्रा. उदय रोटे हे सांस्कृतिक संदर्भ, कवितेतील मिथके, ग्रामसंदर्भाचे स्वरूप व प्रतिमासृष्टी या विषयी निबंध सादर करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी वसंत पाटणकर असतील. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, श्रीधर नांदेडकर, प्रा. दिगंबर पाध्ये, रणधीर शिंदे, बळवंत जेऊरकर या चर्चासत्रात सहभागी होतील.




No comments:

Post a Comment