संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्, गीर्वाणवाणी, देवभाषा, अमरभारती इत्यादी नावे आहेत.
संस्कृत भाषेची निर्मिती
पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.
प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा
‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एकएक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.
संस्कृत भाषेत एका प्राण्याला, एका वस्तूला आणि एका देवाला अनेक नावे असतात.
संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक नावे देण्याची प्रथा होती, उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी नावे आहेत. सूर्याची १२ नावे, विष्णु सहस्रनाम, गणेश सहस्रनाम काही जणांना पाठही असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.
वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे
वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति ।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः ।’ ‘खादति रामः आम्रं ।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Rama eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Rama.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’)
एकात्म भारताची खूण
प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशीला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती
‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता ? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ?
इंडो-यूरोपियन भाषाकुलांतील एक प्राचीन भाषा. या इंडो-यूरोपियन भाषेच्या मूलस्थानाविषयी संशोधकांत अजून एकवाक्यता नाही. ते स्थान भारतात असावे, अशी प्रथम एक कल्पना होती; नंतर ते मध्य आशियात असल्याचे मानण्यात येऊ लागले आणि ते मूलस्थान यूरोपातच कुठेतरी बहुधा मध्य यूरोपात असावे, असे अलीकडे मानण्यात येते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते ती पूर्व यूरोपातील लहानशा प्रदेशात उगम पावली, ही गोष्ट त्यांच्या महत्त्वाच्या शब्दावलीवरुन सूचित होते. विशेषतः ह्यावरुन भौगोलिक वैशिष्ट्य सूचित होते. पण ते स्थान कुठेही असले, तरी तिथून इसवी सनापूर्वी सु. अडीच-तीन हजार वर्षे निघून, वाटेत इराणमध्ये काही काळ स्थिरावून, पुढे इसवी सनापूर्वी सु. १५०० च्या सुमारास ही भाषा बोलणारे लोक बाहेरुन भारतात आले असावेत, असे अनुमान करण्यास हरकत नाही. ही भाषा बोलणारे लोक एकाच वेळी भारतात न येता टोळ्याटोळ्यांनी निरनिराळ्या काळी आले असण्याचीही शक्यता आहे. भारतात येण्यापूर्वी संस्कृत भाषा बोलणाऱ्यांचे पूर्वज आणि प्राचीन इराणी भाषा (अवेस्ता) बोलणाऱ्यांचे पूर्वज काही काळ एकत्र राहिले असावेत, असे संस्कृत व प्राचीन इराणी (अवेस्ता) वाङ्मयातील भाषिक व काही प्रमाणात वैचारिक साम्यावरुन स्पष्ट होते.
संस्कृत भाषेचा अतिप्राचीन नमुना ऋग्वेदा तील मंत्रांत आढळतो. हे मंत्र इ. स. पू. सु. १५००-१२००
ह्या काळात रचले गेले असावेत, असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते. ह्या
भाषेचा त्यानंतरचा सु. साडेतीन हजार वर्षांचा इतिहास निरनिराळ्या
कालखंडांतील उपलब्ध वाङ्मयामुळे ज्ञात आहे. उदा., हल्ली मराठी भाषेत
उपयोगात येत असलेला ‘ दूध ’ हा शब्द क्रमाने दुग्ध (संस्कृत) व दुद्घ
(प्राकृत) ह्या अवस्थांतून उत्कांत झाला आहे, हे वाङ्मयीन पुराव्यावरुन
कळते. परंतु संस्कृतपूर्व त्या शब्दाचे रुप काय असावे, हे जाणण्यास
वाङ्मयीन पुरावा उपलब्ध नाही. तौलनिक आणि ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या आधारे
ते रुप धुघ्त किंवा धुद्घ असे असावे, असे अनुमान करावे लागते.
आपण ज्या भाषेला संस्कृत म्हणून ओळखतो, तिच्यातील सर्व प्राचीन वाङ्मय ऋग्वेदा
तील मंत्रांत आढळते. त्या भाषेची ऐतिहासिक दृष्ट्या स्थूलमानाने तीन रुपे
आढळतात. पहिले रुप वेदांच्या संहिता भागांत दिसणारे; दुसरे उत्तर वैदिक
म्हणजे बाह्मणे, आरण्यके व उपनिषद हे ग्रंथ व वेदांग वाङ्मय यांत आढळणारे व
जिचे पाणिनीने वर्णन केले आहे ती ‘ भाषा ’; आणि तिसरे पाणिनीनंतरच्या
ग्रंथांतून विशेषत: कालिदासादी कवींच्या काव्यांत आढळणारे. ‘ संस्कृत ’
शब्दाचा प्रयोग ती भाषा प्राकृतापासून- म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या नेहमीच्या बोलीभाषेहून - भिन्न असल्याचे दर्शविण्याचा असावा. ‘ संस्कार ’ हा शब्द यास्क त्याच्या निरुक्त
ग्रंथांत वापरतो (तद्यत्र स्वरसंस्कारौ समार्थौ ....). तिथे त्याचा अर्थ
वैयाकरणांना संमत अशी भाषेतले शब्द सिद्घ करण्याची प्रक्रिया असा आहे.
त्यावरुन ‘ संस्कृत ’ म्हणजे ‘ व्याकरणशुद्घ ’, ‘ घडविलेली ’, अतएव
सुशिक्षितांच्या बोलण्यात येणारी शिष्टसंमत भाषा, असा अर्थ होऊ शकेल. त्या
दृष्टीने जिला संस्कृत म्हणता येईल, त्या भाषेच्या तीन ऐतिहासिक अवस्था वर
सांगितल्या पण व्यवहारात मात्र वैदिक संस्कृत व अभिजात संस्कृत अशा दोनच
अवस्था कल्पिण्यात येतात. ह्याखेरीजही संस्कृत भाषेची दुसरी दोन रुपे
उपलब्ध आहेत. पैकी एक रुप रामायण - महाभारत ह्या सूतवाङ्मयात आढळते, तर दुसरे रुप महावस्तुसारख्या बौद्घसंस्कृत ग्रंथांतून आढळते. पहिल्या रुपाला सूतसंस्कृत असे म्हणता येईल. ह्यात अपाणिनीय रुपे बरीच दिसतात. (जसे -
सेवति, अदसि, श्रृत्य, चिंत्य, प्रस्थापयित्वा इ.). दुसऱ्या रुपाला बौद्घ
संस्कृत किंवा मिश्र संस्कृत हे नाव देता येईल. ह्यात दिन्न (सं. दत्त),
आणत्त (सं. आज्ञप्त) अशा प्राकृत शब्दांखेरीज ऋषिस्य, भिक्षुस्य, पिबित्वा
अशी मिश्र रुपेही आढळतात.
वैदिक संस्कृतची जी दोन स्थित्यंतरे झाल्याचे वर सांगितले, ती होताना त्यांचा परिणाम संस्कृतच्या वर्णव्यवस्थेवर फारच तुरळक स्वरुपाचा झाला. उदा., ऋग्वेदा
त स्वरांतरी ड व ढ ह्यांऐवजी येणाऱ्या ळ व ळ्ह ह्या वर्णांना पाणिनीच्या
सूत्रांत स्थान नाही. तसेच वैदिक संस्कृतच्या मानाने अभिजात (क्लासिकल)
संस्कृतात मूर्धन्य वर्ण जास्त आढळतात. ह्याउलट संस्कृतनंतर जेव्हा
लोकांच्या बोलीभाषेतून प्राकृत भाषांचा उदय झाला, तेव्हा भाषेच्या
वर्णव्यवस्थेवर फारच मोठा परिणाम घडून आला. वैदिक संस्कृतातही काही प्रयोग
प्रादेशिक बोलीभेद दर्शवितात. उदा., ऋग्वेदात सूरो दुहिता ह्या अपेक्षित संधीऐवजी एका ठिकाणी सूरे दुहिता (ऋ.
१.३ ४.५) असा संधी आढळतो; तो प्राकृतामुळे असावा, अशी अभ्यासकांची कल्पना
आहे. तथापि वैदिक संस्कृत ही प्राय: त्या काळी प्रचलित असलेल्या
पश्चिमेकडच्या बोलीभाषेवर आधारलेली अशी एकजिनसी भाषा मानण्यात येते. ह्याचे एक यमक म्हणजे वैदिक संस्कृतात इंडो-यूरोपियन ‘ल’
वर्णाच्या ऐवजी ‘र’ वर्णाचा वापर आढळतो. वैदिक संस्कृत व अभिजात संस्कृत
ह्यांमध्ये वर्णव्यवस्थेच्या दृष्टीने जरी सारखेपणा असला, तरी त्यांच्यात
मुख्य भेद आढळतो, तो त्यांच्या व्याकरणात व शब्दसंपत्तीत. व्याकरणाच्या
दृष्टीने पाहिल्यास वैदिक संस्कृतच्या मानाने अभिजात संस्कृत ‘ निर्धन ’
मानावी लागेल. नामे व आख्याने ह्यांच्या रुपांत वैदिक संस्कृतात खूपच
विविधता आहे. अकारान्त नामांचे उदाहरण घेतल्यास वैदिक संस्कृतात त्याच्या
प्रथमेच्या व द्वितीयेच्या द्विवचनांची देवा-देवौ, प्रथमेच्या बहुवचनाची
देवास:-देवा:, तृतीयेच्या एकवचनाची देवा-देवेन, तृतीयेच्या बहुवचनाची
देवेभि:-देवै: अशी भिन्न रुपे आढळतात. अभिजात संस्कृतात ह्यांपैकी एकेकच
रुप अवशिष्ट राहिले आहे. वैदिक भाषेत हेत्वर्थाची दृशे, चक्षसे, सनये,
पीतये, कर्तवे, गन्तवै, पिबध्यै, दावने, आरभम्, प्रष्टुम्, संपृच:, गन्तो:
अशी विविध प्रत्यययुक्त रुपे आढळतात. ह्यांपैकी अभिजात संस्कृतात फक्त एकच
प्रकार (प्रष्टुम्) शिल्ल्क राहिला आहे. वैदिक भाषेत प्रचलित असलेली लेट्
ची रुपे (जसे भवाति) पुढील वाङ्मयात नाहीत. अभिजात संस्कृतात उपसर्ग हे
नेहमी क्रियापदाशी संबंधित व क्रियापदापूर्वी उपयोगात येते. वैदिक
वाङ्मयात उपसर्ग व क्रियापद ह्यांच्यातला संबंध त्या मानाने शिथिल आहे. एक
तर उपसर्ग व क्रियापद ह्यांमध्ये इतर शब्द येऊ शकतात, उदा., स देवाँ एह (आइह) वक्षति (ऋ. १.१.२). दुसरे म्हणजे उपसर्ग क्रियापदानंतरही येऊ शकतो - जसे म गमदूजिभिरा (वाजेभि: आ) सन: (ऋ.
१.५.३). वैदिक भाषेत सामासिक पदे फार नसतात आणि जी असतात, ती बहुधा
इन्द्रावरुणा, युक्तगावा अशी दोन पदांची असतात. ह्याउलट अभिजात संस्कृतात
समासांचे बंड इतके वाढले की, दंडीला ‘ ओज: समासभूयस्त्वमेत गद्यस्य जीवितम्
’, असे म्हणून गद्यवाङ्मयात समासांचे महत्त्व कबूल करावे लागले.
संस्कृतच्या
वैदिक व अभिजात ह्या दोन अवस्थांत शब्दसंपत्तीच्या दृष्टी-नेही मोठा भेद
आढळतो. वैदिक काळातले पुष्कळसे शब्द नंतरच्या काळी प्रचारातून गेल्यामुळे
त्यांचे अर्थ नीटसे कळेनासे झाले हे यास्काच्या निरुक्ता वरुन लक्षात येते. परंतु त्यापूर्वीच्या बाह्मणग्रंथाचे नीट वाचन केले असता,
तिथेही ओकस्, दुर्य, पितु ह्यांसारखे जुने शब्द उपयोगांतून जात असल्याचे व
त्यांच्याऐवजी गृह, अन्न ह्यांसारखे शब्द प्रचलित होऊ लागल्याचे
दृष्टोत्पत्तीस येते. ह्याखेरीज दुसरा एक फरक भाषिक उसनवारीमुळे घडून आला.
संस्कृतभाषक लोक भारतात येऊन स्थायिक झाल्यावर त्यांचा जो एतद्देशीयांशी
संबंध आला, त्यामुळे ह्या भिन्न भाषक समूहांत शब्दांची देवाणघेवाण होणे
अपरिहार्य होते. संस्कृत भाषेत प्रचलित असलेले कित्येक शब्द एतद्देशीय
द्राविड किंवा मुंडा भाषासमूहांतले असल्याचे संशोधकांनी दाखविले आहे. उदा.,
अनल (अग्नि), कुन्तल (केस), कुवलय (कमळ), नीर (पाणी), मीन (मासा), तीर
(किनारा) इत्यादी. ह्यांखरीज आणखी एक फरक घडून आला; तो मात्र लेखनाची एक
नवी शैली प्रचारात आल्यामुळे. व्याकरणशास्त्राने मान्य केलेली पुष्कळशी
क्रियापदांची रुपे पाणिनी- नंतरच्या काळात लोकांच्या बोलीत वापरली जात
नव्हती, हे पतंजलीच्या महाभाष्यावरुन कळते. उदा., परोक्षभूताची
द्वितीयपुरुषी बहुवचनी ऊष, तेर, चक्र ह्यांसारखी रुपे न वापरता त्यांऐवजी
उषिता:, तीर्णा:, कृतवन्त: अशी धातुसाधित विशेषणे लोक वापरु लागले होते.
पुढेपुढे ही प्रवृत्ती इतकी वाढत गेली की, लोकांच्या लेखनात क्रियापदांचा वापर खूपच कमी होऊ लागला. ह्या नव्या शैलीला रा. गो. भांडारकरांनी ‘ नामप्रधान शैली ’ (नॉमिनल स्टाइल) असे अन्वर्थक नाव दिले आहे.
भारतात संस्कृतचा उपयोग वाङ्मयीन निर्मितीसाठी प्रथम होऊ लागला;
त्याकाळचे पहिले उपलब्ध वाङ्मय धार्मिक स्वरुपाचे आहे. नंतरच्या काळात ‘
वेदांग ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रीय स्वरुपाच्या ग्रंथांतही
संस्कृतचा उपयोग आढळतो. त्यानंतर मात्र संस्कृत भाषेत काव्य नाटकादी ललित
वाङ्मय, कथासरित्सागर, पंचतंत्र इ. कथावाङ्मय, गद्य- पद्यमय चंपूकाव्ये, शतककाव्ये, अर्थशास्त्र, कामशास्त्र इ. शास्त्रीय ग्रंथ आणि विविध टीका अशी नाना प्रकारची विपुल ग्रंथरचना झाली.
मेहेंदळे, म. अ.
भाषावैज्ञानिक व व्याकरणिक वैशिष्ट्ये : प्राचीन
वैदिक कालखंडात लेखनपद्घती अस्तित्वात होती किंवा कसे, याबद्दलचे उल्लेख
उपलब्ध होत नाहीत; कारण सर्व वैदिक वाङ्मय मौखिक काटेकोर उच्चरण पद्घतीने
परंपरेने जतन करुन ठेवले गेले. इ. स. पू. पाचव्या शतकातील बौद्घ वाङ्मयात
अक्षरिक, लेखक (रेखा-रेघ काढणे) असे शब्द आढळतात. इ. स. पू. चौथ्या शतकातील ⇨ ब्राह्मी लिपी तील
अतिप्राचीन ताम्रपट गोरखपूर जिल्ह्यात सोहगौरा येथे सापडला. ब्राह्मी लिपी
भारतीय आहे किंवा काय, याबद्दल उलटसुलट मते आहेत. इ. स. पू. तिसऱ्या
शतकातील सम्राट अशोकाचे पस्तीस शिलालेख आहेत. त्यांतील दोन शिलालेख ⇨ खरोष्ठी लिपी त आहेत. उर्वरित बरेच ब्राह्मी लिपीत आहेत. आज संस्कृत भाषा अन्य लिप्यांतही लिहिली जाते. त्यांपैकी ज्या ⇨ नागरी लिपीत किंवा
देवनागरी लिपीत लिहिली जाते, त्या लिपीची सुरुवात सहाव्या-सातव्या शतकांत
आढळते. लिपीच्या सोपेपणाने ती अल्पावधीत सर्वत्र पसरली. दक्षिण भारतामध्ये
याच दरम्यान ग्रंथलिपीचा वापर तालपत्रांवर किंवा भूर्जपत्रांवर
लिहिण्यासाठी केला जात असे.
संस्कृत भाषेतील स्वर आणि व्यंजने उच्चरताना दोन प्रकारचे प्रयत्न करावे लागतात -
बाह्य आणि आभ्यन्तर. अ, इ, उ, ऋ, लृ हे पायाभूत स्वर. यांना उदात्त,
अनुदात्त व स्वरित असे स्वराघात असतात. परत अनुनासिक, निरनुनासिक, ऱ्हस्व,
दीर्घ व प्लुत असेही भेद असतात. ए, ओ, ऐ, औ हे संधिस्वर असून त्यांचेही
वरीलप्रमाणे प्रकार होतात.
बाह्यप्रयत्न (११)
|
||||
विवार, श्वास,
अ घोष,
अल्पप्राण
|
विवार, श्वास,
अ घोष,
महाप्राण
|
संवार, नाद,
घोष,
अल्पप्राण
|
संवार, नाद,
घोष,
महाप्राण
|
उदात्त,
अनुदात्त,
स्वरित
|
क, च, ट, त, प
|
ख, छ, ठ, थ, फ, श, ष, स
|
सर्व स्वर, ज, ञ् , ब, म, ग, ङ्, ड, ण, द, न, य, र, ल, व
|
झ, भ, घ, ढ, ध, ह
|
सर्व स्वर,
|
आभ्यन्तर प्रयत्न
|
||||
स्पृष्ट
|
ईषत्स्पृष्ट
|
विवृत
|
संवृत
|
|
क ते म
(स्पर्श)
|
य, र, ल, व
अन्त:स्थ
|
सर्व स्वर
श,ष,स,ह
|
प्रयोगावस्थेतील अकार
|
|
या दोन्ही प्रयत्नांचा विचार तैत्तिरीय ⇨ प्रातिशाख्या
मध्ये सूक्ष्म रीतीने केलेला आहे. वेगवेगळ्या वर्णांचे उच्चरण होत असताना
छातीपासून ते ओठापर्यंत श्वासाचे आघात कुठे व कसे होतात, याचा विशेष विचार
प्रातिशाख्यांनी केला. त्यावर भाषाशास्त्रातील ध्वनिव्यवस्थेची उभारणी
झालेली आहे. जोडाक्षरे हेही संस्कृत भाषेचे एक वैशिष्ट्य आहे.
वाक्यामध्ये कर्ता,
कर्म, क्रियापद यांच्या कमाला महत्त्व नाही. प्रत्ययांवरुन कर्ता, कर्म
समजते. विशेषणे, सर्वनामे, धातुसाधिते, समास, संबद्घशब्द, अव्यये असे
शब्दप्रकार असतात. अव्यये व काही धातुसाधिते अविकारी असतात.
नामे व विशेषणे स्त्रीलिंगी,
पुपुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी तसेच एकवचनी, द्विवचनी किंवा अनेकवचनी
असतात. ती एकूण आठ विभक्तींमध्ये व्यक्त केली जातात. प्रत्येक विभक्तीचे
तीन वचनांतील प्रत्यय वेगवेगळे असतात. विशेषणांमध्ये तर- तम-भाव
दाखविण्यासाठी प्रत्यय आहेत. उदा., अल्प - अल्पियस् -
अल्पिष्ठ. संस्कृत भाषेत गुणवाचक, संख्यावाचक तसेच क्रमवाचक विशेषणे आहेत.
देव हे नाम व पूज्य हे त्याचे विशेषण यांची विभक्तिरुपे अशी :
|
एकवचन
|
द्विवचन
|
बहुवचन
|
प्रथमा
द्वितीया
तृतीया
चतुर्थी
पंचमी
षष्ठी
सप्तमी
|
पूज्य: देव:
पूज्यम् देवम्
पूज्येन देवेन
पूज्याय देवाय
पूज्यात् देवात्
पूज्यस्य देवस्य
पूज्ये देवे
|
पूज्यौ देवौ
पूज्यौ देवौ
पूज्याभ्याम् देवाभ्याम्
पूज्याभ्याम् देवाभ्याम्
पूज्याभ्याम् देवाभ्याम्
पूज्ययो: देवयो:
पूज्ययौ: देवयौ:
|
पूज्या: देवा:
पूज्यान् देवान्
पूज्यै: देवै:
पूज्येभ्य: देवेभ्य:
पूज्येभ्य: देवेभ्य:
पूज्यानाम् देवानाम्
पूज्येषु देवेषु
|
तिन्ही लिंगांतील नामांचे स्वरान्त व व्यंजनान्त असे गट केलेले असून त्या त्या गटाला विशिष्ट प्रत्यय लागतात.
क्रियापदे दहा प्रकारची कल्पिली आहेत. ती अशी
: वर्तमान, विध्यर्थ, संकेतार्थक, स्य भविष्यकाळ, तास् भविष्यकाळ,
आज्ञार्थ, वैदिक आज्ञार्थी इच्छार्थक (नंतर लुप्त), भूतकाळ, परोक्षभूत,
तृतीयभूत. नामांप्रमाणे क्रियापदांनाही प्रत्यय लागतात. हे प्रत्यय वरील
दहांपैकी अर्थ, काल,कर्ता किंवा कर्म वचन व पुरुष (प्रथम, द्वितीय व तृतीय)
दाखवितात.अर्थाचे एकाहून अधिक घटक एका प्रत्ययातून दिसतात. हे संस्कृत
भाषेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. नाम व क्रियापदे यांच्या प्रत्ययांचा
मूळ आराखडा असून त्यानुसार त्यांची इष्ट रुपे तयार होतात. त्यामुळेच
संस्कृत व्याकरणाला उत्पादनक्षम (जनरेटिव्ह) व्याकरण म्हणतात.
|
एकवचन
|
द्विवचन
|
अनेकवचन
|
प्रथम पुरुष -
द्वितीय पुरुष -
तृतीय पुरुष -
|
गच्छामि
गच्छसि
गच्छति
|
गच्छाव:
गच्छथ:
गच्छत:
|
गच्छाम:
गच्छथ
गच्छन्ति
|
‘
गच्छामि ’ यातील ‘ मि ’ हा प्रत्यय वर्तमानकाळ, कर्ता व प्रथम पुरुष असे
घटक दाखवितो. धातुपाठानुसार सर्व धातू दहा गटांमध्ये विभागलेले आहेत. ते
आत्मनेपदी, परस्मैपदी किंवा उभयपदी असून सकर्मक किंवा अकर्मक असतात.
त्यांना प्र, परा, अप, अनु यांसारखे उपसर्ग जोडले असता त्यांच्या अर्थांत
फरक पडतो उदा., भू (असणे) या धातूला ‘ अनु ’ हा उपसर्ग जोडला असता, अनुभवणे
अशा अर्थाचे क्रियापद बनते. वाक्यरचनेत कर्तरी, कर्मणि व भावे, कर्मकर्तरि
असे प्रयोग असतात.
सर्वनामे यद् - तद् (जे - ते), अस्मद् - युष्मद (मी-तू), किम् (प्रश्नार्थक), एतद् -
इदम् (हा, ही, हे), अदस् (तो, ती, ते), सर्व इ. असून ती तीनही लिंगांमध्ये
आहेत. धातूंपासून केलेली रुपे म्हणजे धातुसाधित विशेषणे क्रियापदाचे काम
करतात.
समास हे संस्कृत भाषेचे मोठे वैशिष्ट्य आहे. दोन किंवा अधिक पदे नियमांनुसार एकत्र आली की,
समास तयार होतो. समासाचे चार प्रमुख प्रकार (द्वंद्व, अव्ययीभाव,
तत्पुरुष, बहुवीही) आहेत. त्यांपैकी अव्ययीभाव समासाचा अव्ययाप्रमाणे वापर
होतो. उर्वरित समास विशेषणांप्रमाणे वापरले जातात. विधाने एकमेकांना
जोडण्यासाठी च, परं, परंतु, किंतु, अपिच, अपिवा इ. संबद्घशब्द वापरले
जातात.
अव्यये स्थलवाचक (यत्र-तत्र),
कालवाचक (रात्रौ, दिवा, सर्वदा), संबद्घवाचक (यथा- तथा), अन्यथा तसेच सह,
विना, नम:, बहिः स्वस्ति अशा प्रकारची आहेत. त्यांबरोबर विशिष्ट विभक्तीतील
शब्द वापरावे लागतात.
संधी हे आणखी एक वैशिष्ट्य. दोन शब्दांचा संधी होतो व या शब्दांना स्वतंत्र अस्तित्व असते. त्यांचे स्वरसंधी, विसर्गसंधी व व्यंजनसंधी असे प्रकार आहेत. सुप्रसिद्घ अमेरिकन भाषावैज्ञानिक ⇨ लेनर्ड ब्लूमफील्ड याने संस्कृतेतर पाश्चात्त्य भाषांना संधिनियम लावून तशी रुपे सिद्घ करता येतात, हे दाखवून भाषाशास्त्रात मोलाची भर घातली.